मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात चालले तरी काय? आठवड्याभरात रविकांत तुपकरांसह एका महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न!

278

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (19 FEB.2023) बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ढेपाळलेल्या शासन व प्रशासनाविरोधात 11 फेब्रुवारी रोजी तर एका महिलेने 19 फेबुवारी रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही कायदा व न्यायव्यवस्थेच्या राज्यात एक शोकांतीकाच म्हणावी लागेल.

भारतीय राज्यघटनेचे प्रत्येकाला व्यक्ती व विचार, धर्मप्रचार व आंदोलन करण्याचे स्वातंत्र दिले आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील ढेपाळलेले प्रशासन दुर्लक्ष करीत असेल तर आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु नागरिकांनी आत्मदहनाचा इशारा देवून आत्मदहनाचा प्रयत्न करणे ही प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराची स्थीती स्पष्ट करते. शेतकरीनेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी निवेदन, मोर्च, आंदोलनाच्या माध्यमातून शासन व प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, परंतु न्याय्य मागण्या मान्य न झाल्याने त्यांनी सरकार व प्रशासनाला इशारा देत पोलिसांपेक्षा तुपकरांचे नेटवर्क पावर फुल्ल असल्याने ते अखेर शनिवार 11 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी हातामध्ये डिझेलची कॅन घेवून पोलिसांच्या वेषात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले व अंगावर डिझेल घेत आत्मदहनाचा प्रयत्न करणार तेवढ्याच त्यांना पोलिसांनी वेळीच पकडल्याने पुढील अनर्थ टळला.

तुपकरांच्या अत्मदहन आंदोलनाच्या घटनेला 8 दिवस उलटत नाही तोवर परत एका अत्याचारग्रस्त महिलेने पोलिस प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील न्याय न मिळाल्याने त्या महिलेने रविवार 19 फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाला आत्मदहन करण्याचा इशारा देत त्यांनी सुध्दा ठरलेल्या शिवजयंतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष हातात घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना सुध्दा पोलिसांनी वेळीच पकडल्याने अनर्थ टळला.

भविष्यात एखाद्याचा जीव सुध्दा जावू शकतो..

न्याय मिळाला नाही, म्हणून आत्मदहनाचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. परंतु न्यायासाठी सर्वसामान्य नागरिक शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करुन देखील मागण्यांची कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्याने नागरिकांना नाईलाजास्तव आत्मदहन करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. शासन व प्रशासनाने याचा विचार केल्यास असे प्रकार थांबू शकतात, अन्यथा आत्मदहनाच्या इशाऱ्यातून भविष्यात एखाद्याचा जीव सुध्दा जावू शकतो, एवढे मात्र निश्चीत!