अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात सहा तालुक्यातील 57 गावातील 1329.60 हेक्टर क्षेत्रावरील पिके झाली उध्दवस्त !

372

-खामगाव तालुक्यात सर्वाधीक 936.60 हेक्टर क्षेत्र बाधीत
-मोताळा तालुक्यात 297.8 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान
-मका, कांदा, उन्हाळी मुंग, भुईमुंग, भाजीपाला,
टरबुज-खरबुज, उन्हाळी ज्वारी व फळबाग झाली उध्दवस्त

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (27.Apr.2023) नैसर्गीक आपत्ती, कधी ओला, कधी कोरडा तर कधी अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांच्या पाचीलाच पुंजलेला आहे. नैसर्गीक आपत्तीमुळे बळीराजाच्या तोंडी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होत आहे. बुधवार 26 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातील 6 तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे 57 गावातील 1329.60 हेक्टर क्षेत्रातील कांदा, उन्हाळी मुंग, भूईमुंग, भाजीपाला, टरबुज, खरबूज, मका, कांदा, फळबाग, उन्हाळी ज्वारीच्या पिकांचे लाखोंचे नुकसान झाल्याची जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी बुलढाणा यांच्यावतीने देण्यात आली आहे.

जिल्ह्यात 26 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास झालेल्या वादळीवाऱ्यासह गारपिट व अवकाळी पावसामुळे चिखली तालुक्यातील 8 गावातील कांदा, उन्हाळी मुंग, भुईमुंग, भाजीपाला, टरबूज-खरबूज पिकांचे 91.80 हेक्टरवरील मोठे नुकसान झाले आहे. मोताळा तालुक्यातील 16 गावातील 490 शेतकऱ्यांचे मका,कांदा व फळबागाचे 297.80 हेक्टर क्षेत्रावरील पिके उध्दवस्त होवून मोठे नुकसान झाले आहे. मलकापूर तालुक्यात 1 गावातील मका , कांदा पिकांचे 0.80 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले आहे. खामगाव तालुक्यात 30 गावातील सर्वाधीक जास्त 936.60 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, उन्हाळी मुंग, भुईमुंग, भाजीपाल, टरबुज-खरबुज पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेगाव तालुक्यातील 1 गावातील फळबागाचे 0.60 हेक्टरवरील नुकसान झाले आहे. नांदुरा तालुक्यातील एका गावात उन्हाळी ज्वारीचे 2 हेक्टरवरील नुकसान झाले. अशाप्रकारे जिल्ह्यात 57 गावातील 1329.60 हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सर्व्हे करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या- आ.संजय गायकवाड

मोताळा तालुक्यात बुधवार 26 एप्रिल रोजी आलेल्या अवकाळी पाऊस, गारपीठ व सुसाट्याने वाऱ्यांमुळे मोताळा तालुक्यातील टाकळी-वाघजाळ, , रोहिणखेड, मुर्ती, जयपूर-कोथळी, तरोडा, पान्हेरा, खंडवा, आडविहीर, राजूर, मोताळा, वारुळी, चिंचपूर, परडा, धा.देशमुख, अंत्री, हरमोड या गावामध्ये जवळपास 297.8 हेक्टर क्षेत्र बाधीत होवून त्यामध्ये 490 शेतकऱ्यांचे मका, कांदा, फळबाग पिकांचे मोठे नुकसान झाले. आ.संजय गायकवाड यांनी आज गुरुवार 27 एप्रिल रोजी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानाची सर्व्हे करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याचे आदेश तहसिलदार डॉ.सारीका भगत व महसूल प्रशासनाला दिले.