दुय्यम ठाणेदाराने टाकले भक्तांच्या नास्त्यात पाणी; तळणी येथील देवी विसर्जनावेळीचा प्रकार !

84

घुले साहेब माफी मांगा, अन्यथा उपोषणास बसू ; ग्रामस्थांचे ठाणेदारांना निवेदन

मोताळा-(28 OCT. 2023)तालुक्यातील तळणी येथे सर्व सण, उत्सव सर्व जातीधर्मांचे लोक गुण्या गोविंदाने साजरे केले करतात. 50 वर्षात येथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही. परंतु शुक्रवार 27 ऑक्टोबर रोजी देवी समाप्ती मिरवणुकी दरम्यान बोराखेडी पोस्टे.चे दुय्यम ठाणेदार घुले साहेबांनी मिरवणुकीत आलेल्या लोकांसाठी बनविलेल्या चहा, नास्ता व चुलीत पाणी टाकल्याने वाद पेटला होता. परंतु गावकऱ्यांनी संयम ठेवून शांत केला. चुलीत पाणी टाकणाऱ्या दुय्यम ठाणेदारांने माफी मागावी, अन्यथा उपोषण छेडण्याचा इशारा तळणी ग्रामस्थांच्यावतीने आज 28 ऑक्टोबर रोजी बोराखेडी ठाणेदारांना एका निेवेदनाद्वारे देण्यात आला.

मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या तळणी येथे नवरात्री विसर्जन कार्यक्रम चालू असता बोराखेडी पोस्टे.चे दुय्यम ठाणेदार कुठल्याही प्रकारची नोटीस नसतांना घुले व त्यांचे सहकारी यांनी जाणून बजून नाहक त्रास देत दमदाटी करीत त्रास देण्याचे काम केल्याचा आरोप निवेदनात केला आहे. देवीच्या विसर्जन केल्यानंतर मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांसाठी चहा व नाश्ताचा कार्यक्रम चालू असतांना घुले यांनी चहा व नाश्ता न करु देता चालू असलेल्या चुलीत पाणी टाकून नास्ता फेकून देवून माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य त्यांनी केले. याबाबत गावातील नागरिकांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिस प्रशासनाला जाब विचारला असता त्यांची बोलती बंद झाली होती. नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या नास्ता व चहात पाणी टाकणाऱ्या दुय्यम ठाणेदार घुले यांनी तळणी वासीयांची माफी मागावी अन्यथा, तळणी वासीयांच्यावतीने पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. निवेदनावर मोताळा तालुका किसान सेना प्रमुख संजय रमेश नारखेडे, प्रविण मधुकर नारखेडे, संदीप दिनकर झोपे, अक्षय नारखेडे, सागर बोदडे, निखील नारखेडे, दिपक खर्चे, प्रदीप खानंदे, अक्षय वाघोळे, अंकुश सुपे, तुषार नाफडे, प्रफुल बऱ्हाटे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सर्व जाती धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने उत्सव करतात साजरे

तळणी गावात विविध सण उत्सव मोठ्या प्रमाणात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रीत येवून साजरे करतात. आतापर्यंत देवी विसर्जन प्रसंगी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही, असा गावाचा इतिहास आहे. परंतु 27 ऑक्टोबरच्या रात्री देवी विसर्जनावेळी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या चहा व नास्त्याच्या घमेल्यामध्ये पोलिसांनी पाणी टाकल्याने तळणी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक होवून पोलिसांनी कोणत्या नियमानुसार पाणी टाकले, याचा जाब विचारत असतांना पोलिसांची बोलती मात्र बंद झाली असल्याचे व्हीडीओ प्रसार माध्यमांना मिळाले आहेत.