उध्दव ठाकरे म्हणजे ‘हम दो हमारे दो’ ची परिस्थीती-बावनकुळे

219

मुंबई(BNUन्यूज) शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठविण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबर रोजी रात्री घेतला असून ते धनुष्यबाण हे चिन्ह उध्दव ठाकरे व शिंदे गटाला वापरता येणार नाही. यामुळे अधेंरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपाला फायदा होणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. तर प्रसार माध्यमांशी बोलतांना शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविल्याने उध्दव ठाकरेची परिस्थीती ‘हम दो हमारे दो’ होणार असल्याचा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना लगावला आहे.

पुढे बोलतांना बावनकुळे यांनी शिवसेनेचे जे १२ खासदार बाहेर पडले आहेत, त्यांना माहीत आहे की आम्ही मोदींच्या विश्वासावर आम्ही निवडून आलो आहोत आणि त्यांच्याकडे जे बाकी आहेत, त्यांनाही हे माहीत आहे. त्यामुळे ते आता जाणीवपूर्वक त्यांची गेलेली पत परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ही फार मोठी त्सुनामी आलेली आहे आणि ही सुनामी पूर्णपणे उध्वस्त करून गेली आहे. शिवसेनेची आज जी परिस्थिती झाली ती केवळ उद्धव ठाकरेंच्या चुकीच्या वागण्यामुळे झाली आहे आणि त्यांना कोणी ढकलेलं नाही, ते स्वत:च पळून गेले आहेत. आम्ही तर त्यांचे दरवाजे कितीदा ठोकले, दरवाजे उघडायलाच तयार नव्हते. त्यामुळे मला वाटतं त्यांनी आता पुन्हा एकदा चिंतन करण्याची गरज आहे. पण ते आत्मचिंतन करत नाहीत. एवढे ४० आमदार, १२ खासदार सोडून गेले तरी देखील तरी आत्मचिंतन होत नसल्याने ‘हम दो हमारे दो’ ही परिस्थिती उद्धव ठाकरेंची होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

जिंकून दाखवणारच..
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत, ‘जिंकून दाखवणारच’ अशी दोनच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.तर मराठी माणूस व हिंदुत्ववादी अदृश्य शक्ती ‘मुंबई मराठी माणसांची’ यासाठी जोरदार कॅम्पेन सुरु असून त्याच्या पोस्टही सोशल मिडीयावर पहायला मिळत आहे, परंतु बाजी कोण मारेल हा येणारा काळच सांगेल, एवढे मात्र निश्चीत!

हे पाप कधीही मिटू शकणार नाही-खैरे
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी शिवसेना उभी केली होती. मात्र एका माणसाने शिवसेना पक्ष फोडला आहे. त्यांचे हे पाप कधीही मिटू शकणार नाही. म्हणूनच आमचा त्यांच्यावर राग आहे. बाळासाहेबांनी मोठ्या कष्टाने शिवसेना उभारली होती. एका व्यक्तीने सगळा नाश केला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे समर्थकांचा गट न्यायालयाचे दार ठोठावणार आहे. तशी माहिती चंद्रकांत खैरे यांच्यासह खासदार अरविंद सावंत यांनीही दिली आहे.

मी अनेक चिन्हांवर निवडणूक लढविली-शरदचंद्र पवार
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेना संपणार असल्याचं बोललं जात याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सवेसर्वो शरदचंद्र पवार यांना प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले, आता नवीन चिन्ह घ्यायचं आणि निवडणूक लढवायची. मी स्वत: पहिली निवडणूक लढलो तेव्हा बैल जोडीवर, दुसरी निवडणूक ही गाय-वासरू या चिन्हावर तर तिसरी निवडणुकीत चिन्ह चरखा होते, चौथी निवडणूक हाताचा पंजा या चिन्हावर लढलो आणि आता घड्याळ हे चिन्ह आहे. एवढ्या मोठ्या वेगवेगळ्या चिन्हावर लढलो असल्याचे शरदचंद्र पवार यांनी सांगत निवडणूक चिन्हाचा फायदा होत नाही, ते लोकांवर अवलंबून असते. त्यामुळे शिवसेना अजिबात संपणार नाही, उलट अधिक जोमाने वाढेल. त्यांची जी तरूण पिढी आहे ती जिद्दीने उतरेल आणि ते आपली शक्ती वाढवतील. आता जी पोटनिवडणूक आहे त्या निवडणुकीला काँग्रेस व राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याने शरदचंद्र पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले.