लांडग्याने धाड परिसरात सहा बकऱ्या केल्या फस्त; 70 हजाराचे नुकसान

896

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (17.JUNE.2023) माणसाचा मोठ्या प्रमाणात जंगलात शिरकाव केल्याने, जंगली वन्यप्राण्यांचा गावात मुक्तसंचार वाढला आहे. अनेक हिंस्त्र प्राण्यानी रोडवर व गावात माणसावर हल्ला चढवित असल्याच्या घटना घडत आहे. बुलढाणा तालुक्यातील धाड भाग-1 शिवारात गट नं.6 मध्ये शेतकरी दिवावकर गंगाधर जोशी यांच्या शेतात असलेल्या बकऱ्यावर लांडग्याने हल्ला चढवित 6 बकऱ्या फस्त केल्या तर काही जखमी झाल्या आहेत. सदर घटना आज शनिवार 17 जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. शेतकऱ्याचे जवळपास 65 ते 70 हजाराचे नुकसान झाले आहे, तसा पंचानामा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

बुलढाणा तालुक्यातील धाड येथील सचिन जोशी हे वडिलोपार्जीत शेळी पालनाचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे 23 शेळ्या व 2 बोकड होते. सकाळी नेहमी प्रमाणे शेळयांचे गोठ्याची साफसफाई व चाऱ्यापाणी करण्यासाठी गेले असता त्यांना सहा शेळ्या मृत अवस्थेत आढळल्या व बाकीच्या शेळ्या जाळीतून बाहेर येऊन दुसऱ्यांच्या शेतात घाबरलेल्या अवस्थेत बसलेल्या आढळून आल्या. त्यांनी घटनेची माहिती त्यांनी वन्यजिवप्रेमी निलेश गुजर यांना दिली. त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांना दिल्याने बुलढाण वनविभाग वनक्षेत्रपाल अभिजित ठाकरे, वनपाल अंबेकर, वनरक्षक डी.बी.घोरपडे,वनरक्षक अक्षय शिंदे ,वनमजूर शंकर भिंगारे यांनी घटनास्थळी पोहोचुन घटनेची पाहणी करून पंचनामा केला.यावेळी धाडचे पशुवैद्यकीय अधिकारी नितीन दयाव्हणे हजर होते. यामध्ये जोशी कुटुंबीयांचे जवळपास 65 ते 70 हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शेतकऱ्याला वनविभागाच्यावतीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.