लोकअदालतीमध्ये 15 प्रकरणाचा निपटारा; 8.83 लक्ष रु.चा दंड वसूल

76

विभक्त झालेल्या पती-पत्नीचा फुलविला संसार !

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा-(9.Sep.2023) विवाह म्हणजे दोन जीवांचे पवित्र मिलन आहे. संसार म्हटले की, भांड्याला भांडे लागतेच, आणि मग दोन जीव एकमेकापासून दुरावून त्यांचे प्रकरण कोर्टापर्यंत पोहचते. असेच तीनवर्षापासून एकमेकापासून विभक्त झालेल्या मोताळा तालुक्यातील तरोडा येथील सौ.पुजा मथुरे व जालना जिल्ह्यातील परतुर येथील राहुल मथुरे यांच्यामध्ये समेट घडवून त्यांचा संसार फुलविण्यात मोताळा येथे आज 9 सप्टेंबर रोजी आयोजीत राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून शक्य झाले.. तसेच लोकअदालतीमध्ये 534 प्रकरणापैकी 15 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात 8 लक्ष 83 हजार 330 रुपयांचा तडजोड शुल्क वसूल करण्यात आला.

मोताळा दिवाणी कनिष्ठ स्तर येथे आज शनिवार 9 सप्टेंबर रोजी राज्य विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयाचे पॅनल प्रमुख म्हणून एस.पी. पांडव अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क.स्तर, मोताळा हे होते. तर प्रमुख पंच म्हणून एम.के. शर्मा विधीज्ज्ञ तथा अध्यक्ष वकिल संघ मोताळा हे होते. लोकअदालतीमध्ये सौ. पुजा राहुल मथुरे रा.तरोडा व जालना जिल्ह्यातील परतुर येथील राहुल रमेश मथुरे यांचा विवाह 2016 मध्ये झाला होता. त्यांना एक मुलगा सुध्दा आहे, परंतु किरकोळ वादातून ते दोघे पती-पत्नी विभक्त होवून त्यांचा 2020 पासून मोताळा न्यायालयात वाद चालू होता, या प्रकरणात पॅनल प्रमुख एस.पी. पांडव व विधिज्ज्ञ मनिष शर्मा, माणीकराव पवार यांनी दोघा पती-पत्नीची समजूत घालून सदरचे प्रकरण दोन्ही पक्षकारांच्या मर्जीने आपसात समेट घडवून आणून त्यांची संसाराची गाडी पुन्हा रुळावर आणली.

राष्टीय लोकअदालतमध्ये एकूण प्रलंबीत दिवाणी प्रकरणे 3९ व फौजदारी ५३४ प्रकरणे ठेवण्यात आले होते. यापैकी फौजदारी १५ प्रकरणे तडजोड करुन निकाली काढण्यात आले असून ८३,३०० रक्कम जमा करण्यात आली. तर दाखलपूर्व बँकेचे ६५५ प्रकरणे ठेवण्यात आले होते. त्यामध्ये एकूण १९ प्रकरणे तडजोडीस पात्र ठरले व त्यातून १,१८,६१८ रक्कम वसूल करण्यात आली. ग्रामपंचायतीचे वादपूर्व १०७४ प्रकरणापैकी १३३ इतकी प्रकरणे तडजोडीस पात्र ठरुन त्यातून १,३१,५४5 रक्कम तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची दाखलपूर्व ५५५ प्रकरण ठेवण्यात आली होती, त्यापैकी 1 प्रकरण तडजोडीस पात्र करुन त्यातून १९,९३० एवढा दंड वसूल करण्यात आला.