‘त्या’बारबाप्याने बारा बकऱ्या ठार मारल्या

54

तालखेड येथील घटना;80 हजाराचे नुकसान

मोताळा- तालखेड येथे शेतातील शेडमध्ये बांधलेल्या 14 बकऱ्यांना ‘त्या’ बारबाप्याने टोकदार वस्तूने टोचून जखमी केले. त्यातील 12 बकऱ्या मृत्यूमुखी पडल्याने शेतकऱ्याचे 80 हजाराचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला, परंतु त्याला पकडणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.

तालुक्यातील तालखेड येथील ज्ञानेश्वर हरी चोपडे यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, त्यांचे चूलत बंधून प्रमोद निवृत्ती चोपडे यांच्या शेतामध्ये बकऱ्यांचे शेड आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे शेडमध्ये बकऱ्या बांधल्या होत्या. 19 ते 20 मार्चच्या दरम्यान शेतातील शेडमधील बकऱ्यांपैकी 14 बकऱ्यांच्या गळ्याला टोकदार वस्तून टोचून जखमी केले. त्यातील 12 बकऱ्या मरण पावल्या. यामुळे प्रमोद चोपडे यांचे 80 हजाराचे नुकसान झाले आहे. अशा फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी अज्ञातावर भादंवीचे कलम 429 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकार कोणत्या बारबाप्याने केला, त्याला पकडणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.