जिल्हा नियोजन सभागृहात ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्या’चे उत्साहात उद्घाटन
बुलढाणा – जलसंपदा विभागाच्या वतीने १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्या’चा शुभारंभ स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जलव्यवस्थापन ही आजच्या काळाची अनिवार्य गरज असून, पाण्याचा काटकसरीने वापर आणि व्यवस्थापनाची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे होते. यावेळी पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता बापूसाहेब गाडे, जिगाव प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता श्रीराम हजारे, जलयुक्त शिवार अभियानाचे तज्ज्ञ सदस्य रामकृष्ण पाटील, तसेच कार्यकारी अभियंता सुनील बोरले, शरद नागरे, परमजितसिंग जुनेजा, तुषार मेतकर, प्रवीण चावरे आणि सपना डावरे यांची उपस्थिती होती.
जलपूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व आद्य अभियंता सर एम. विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली. विशेष म्हणजे, बुलढाणा जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेल्या पूर्णा, खडकपूर्णा, ज्ञानगंगा, नळगंगा व पैनगंगा या नद्यांच्या जलकलशाचे पूजन करून जिल्ह्याच्या जलसमृद्धीचा जागर करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. देवरे पुढे म्हणाले की, नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे आणि पाण्याच्या थेंबाथेंबाचे महत्त्व पटवून देणे हा या पंधरवाड्याचा मुख्य उद्देश आहे. जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविल्यास भविष्यातील पाणी संकट टाळता येईल. यावेळी रामकृष्ण पाटील, शरद नागरे, बापूसाहेब गाडे आणि श्रीराम हजारे यांनीही जलव्यवस्थापन व सिंचन विषयावर आपले विचार मांडले.
या पंधरवाड्यामध्ये शेतकरी पाणीवापर संस्थांशी संवाद, धरण व कालवा स्वच्छता अभियान, नदी प्रदूषण नियंत्रण व पांदण रस्ता दुरुस्ती, उपसा सिंचन तक्रारींचे निरसन व आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन यांसारखे विविध लोकउपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत.
सौ. सुरेखा जाधव यांनी प्रास्ताविक केले व जलगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजीतसिंग राजपूत यांनी, तर आभार प्रदर्शन उपविभागीय अभियंता अंकित चौथनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक अभियंता काजल जाधव, निलेश उबाळे, शरद भारोटे, केशव जवादे यांच्यासह जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचा समारोप उपस्थित सर्वांनी घेतलेल्या ‘जलप्रतिज्ञेने’ करण्यात आला.


























