दत्तपूर येथे ‘सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’चा उत्साहात प्रारंभ

6
  • जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी स्वतः घेतली ग्रामसभा
  • गावकऱ्यांच्या समस्यांचेही केले निराकरण

बुलढाणा: (शासकीय न्युज)छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर दरम्यान आयोजित सेवा पंधरवडा आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची बुलढाणा तालुक्यातील दत्तपूर येथे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्वतः ग्रामसभा घेत दत्तपूर येथील गावकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले.

दत्तपूर हे जिल्हा प्रशासनाचे दत्तक गाव असून या गावाच्या विकासामध्ये जिल्हाधिकारी यांनी व्यक्तिशः लक्ष दिले आहे. या सेवा पंधरवाड्याच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शिव, पाणंद रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले व त्याबाबत चावडी वाचनाद्वारे गावकऱ्यांना अवगत करण्यात आले. तसेच जिवंत ७/१२ मोहिमेबाबतही गावकऱ्यांना माहिती देण्यात आली व घरकुलाच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. त्याचबरोबर दत्तपूर ग्रामपंचायतीच्या वतीने दत्तपूर जिल्हा परिषद शाळेला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांनीही गावकऱ्यांना संबोधित केले व विविध शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी दत्तपूर गावचे सरपंच संदीप कांबळे, उपसरपंच जीवन दाभाडे, सदस्य आकाश माळोदे, राहीबाई रमेश जाधव, अनिता गजानन भराड, शीतल समाधान माळोदे, तसेच भागवत वानेरे, ग्रामविकास अधिकारी नितीन इंगळे,तलाठी उषा इंगळे, मंडळ अधिकारी पायघन, सहाय्यक जाधव,पोलीस पाटील श्रीकृष्ण राऊत व भास्कर माळोदे, पोलिस जमादार तायडे, मुख्यध्यापक बबन गोरे, समुदाय आरोग्य अधिकारी अंजली चित्ते, आरोग्यसेवक सचिन चिंचोले, सुनीता वैद्य, गजानन जाधव यांच्यासह गावकरी उपस्थित होते.