तुपकरांनी मांडल्या कृषीमंत्रयासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा!!
बुलढाणा(BNU न्यूज)अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्याबाबत अद्यापही पंचनामे करण्यात आले नाही, शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा एक पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. आता परतीच्या पावसाने पुन्हा कहर करत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी मर्यादा किंवा इतर अटी न लादता शेतकऱ्यांना सरकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, यासह आदी मागण्यांसाठी शेतकरीनेते रविकांत तुपकर यांनी कृषीमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा करुन त्यांना निवेदन दिले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज मंगळवार ११ ऑगस्ट रोजी मुंबई येथे मंत्रालयात कृषीमंत्री सत्तार यांची भेट घेवून सोयाबीन – कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, अतिवृष्टीने झालेले नुकसान, परतीच्या पावसामुळे सध्या निर्माण झालेली बिकट परिस्थिती याबाबत माहिती देत वर्तमान परिस्थितीबाब अवगत केले. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेल असतांना त्याचे अद्याप सर्वे करण्यात आलेले नाही. शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई अत्यंत तोकडी असून कोणतीही मतद अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. शेतकरी आधीच संकटात असताना आता परतीच्या पावसाचा कहर सुरु आहे. सोयाबीन पाण्याखाली येऊन तीला कोंब फुटले आहे. राज्य शासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावे, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत देण्यात यावी, तसेच सोयाबीन, कापसाचे पडलेले दर स्थिर राहणे आवश्यक आहे. उत्पादन खर्च वाढला आणि उत्पादन घटल्याने सोयाबीनला किमान प्रतिक्विंटल ९ हजार रुपये आणि कापसाला प्रतिक्विंटल १३ हजार रुपये भाव स्थीर रहावा यासाठी सोयापेंड (डीओसी) निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, मागील वर्षी आयात केलेल्या ५ लाख मेट्रिक टन सोयापेंडला डिसेंबरपर्यंत दिलेली मुदतवाढ रद्द करावी, मार्केट स्थिर राहण्यासाठी सोयापेंड आयात करणार नाही, हे जाहीर करावे, यंदा १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, सोयाबीनची वायदे बाजारावरील बंदी उठवावी, खाद्य तेलावरील आयात शुल्क ३० टक्के करावे, कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे ११ टक्के ठेवावे. कापूस व सूत निर्यातीला प्रोत्साहन द्यावे या मागण्या राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मांडून या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याची मागणी ना. अब्दुल सत्तार यांच्याशी सविस्तर चर्चा करुन ५ नोव्हेंबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ६ नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात एल्गार मोर्चा काढून राज्यव्यापी आंदोलनाचा श्रीगणेशा करणार असल्याचेही तुपकरांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही निवेदन देण्यात आले.