ज.जामोद तालुक्यातील ‘त्या’कुटुंबीयांच्या उपोषणाची पाचव्या दिवशी दखल !

295

अल्पवयीन मुलीला 22 जानेवारीपर्यंत शोधण्याचे पोलिस प्रशासनापुढे आव्हान!

@buldananewsupdate.com
बुलढाणा(7JAN.2023) महिलांच्या सुरक्षेसाठी शेकडो कायदे केले आहेत परंतु त्याचे अस्तीत्व कागदावरच असल्याचे चित्र ‘कायद्या’च्या राज्यात पहायला मिळत आहे. विषय खूप गंभीर अल्पवयीन मुलीचे अपहरण केले, मुलगी जिवंत आहे का? असेल तर तिला परत आणा, आम्हाला न्याय द्या, या मागणीसाठी जळगाव जामोद तालुक्यातील एका अल्पवयीन मुलींच्या आई-वडील व आजीने 2 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिस प्रशासनाविरोधात उपोषण सुरु केले होते. त्या उपोषणाची पोलिस प्रशासनाने पाचव्या दिवशी दखल घेत 6 जानेवारीला रात्री उशीरा उपोषणकर्त्यांना 15 दिवसात मुलीला शोधून देण्याचे लेखी पत्र देण्यात आल्याने उपोषण तुर्तास मागे घेण्यात आले आहे.

जळगाव जामोद येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणात आ.डॉ. संजय कुटे आणि त्यांच्या ड्रायव्हरचे नाव समोर आल्यामुळे थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व आ. संजय कुटे यांच्या मैत्रीचे फलक लावत गृहमंत्री फडणवीसांना खुले आव्हान उपोषण मंडपातून देण्यात आले होते. सदर आमरण उपोषणाची दखल घेत गृह मंत्रालयाकडून जिल्हा पोलीस प्रशासनाला आदेशीत केल्याचे समोर येत आहे. मागील पाच दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची कोणतेही दखल न घेणाऱ्या पोलीस प्रशासनाने अखेर सहा जानेवारीला रात्री उशिरा उपोषणकर्त्या पीडीत मातापित्यांच्या सर्व मागण्यांची पंधरा दिवसात पूर्तता करण्याचे लेखी पत्र दिले. यावेळी उपोषणकर्त्या मुलीचे आई-वडिल,आजी, बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाध्यक्ष ओमसींग राजपूत, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे ॲड.सतीशचंद्र रोठे, शेख सईद, सुरेखाताई निकाळजे, संजय एंडोले,गजानन झांबरे, वर्षाताई ताथरकर, सुमनताई राजपूत, आशाताई गायकवाड, सिंधुताई अहिर, इमरान शाहा, सय्यद युसुफ, परवीनबी गुलाब शाहा, कुर्बान शाहा यांच्यासह पोलीस अधीक्षक कार्यालय, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी हजर होते.

…अन्यथा 23 जानेवारीला आझाद हिंदचा ‘आक्रोश मोर्चा’!
मागण्यांची पूर्तता करण्याचे पत्र शासनातर्फे बुलढाणा आ. संजय गायकवाड, प्रशासनातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, जिल्हाधिकारी कार्यालय गृह विभागाचे अधिक्षक करे, ठाणेदार चंद्रकांत काटकर आदींनी उपोषण मंडपात भेट देवून पंधरा दिवसात मुलीला वापस आणून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण 22 जानेवारीपर्यंत स्थगीत केल्याचे उपोषण कर्त्यांनी सांगितले. तर पुर्तता न झाल्यास 23 जानेवारी रोजी महिला संघटनांच्या वतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ महीलांचा ‘आक्रोश मोर्चा’ पोलीस अधिक्षक कार्यालयावर आणून निवेदन सादर करण्याचा इशारा यावेळी आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिला.