खतरनाक ‘पीएफआय’वर केंद्र सरकारकडून 5 वर्षासाठी बंदी! दंगली ते हत्यापर्यंत मजल मारीत २० राज्यामध्ये पोहोचली!! २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचे होते स्वप्न!

257

नवी दिल्ली(BNUन्यूज) मागील काही महिन्यापासून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) या संघटनेविरुद्ध मोठी कारवाई केली. ‘एनआयए’ने महाराष्ट्रासह देशात १५ ठिकाणी छापेमारी करत सुमारे १०६ ‘पीएफआय’ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाई एनआयएने आणखी १७० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर केंद्र सरकारने मोठं पाऊल उचचलं असून आज 28 सप्टेंबर रोजी ‘पीएफआय’ संघटनेसह त्यांना सहकार्य करणाऱ्या 8 संघटनांवर 5 वर्षासाठी बंदी घालण्यात आली.

PFI शी संबंधित या रिहॅब इंडिया फाउंडेशन (RIF), कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (CFI), ऑल इंडिया इमाम काउन्सिल (AIIC), नॅशनल कॉन्फेरडरेशन ऑफ ह्युमन राइट्स ऑर्गनायजेशन (NCHRO), नॅशनल विमेन्स फ्रंट, ज्युनिअर फ्रंट, एम्पावर इंडिया फाउंडेशन, रिहॅब फाउंडेशन फाऊंडेशन केरळ या संस्थांवरही बेकायदेशीर संस्था म्हणून बंदी घातली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अध्यादेशात याबाबत माहिती देण्यात आली आहे. पीएफआयच्या विध्वंसक कारवाया पाहता सरकारने UAPA कायद्यांतर्गत ही बंदी घातली आहे. कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा इतर कोणत्याही घटकाविरुद्ध देशविरोधी किंवा दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा पुरावा आढळला, तर ती व्यक्ती, संस्था किंवा इतर घटकांवर UAPA नुसार केंद्र सरकार निर्बंध लादू शकते. केंद्र सरकारने आपल्या अध्यादेशात पीएफआय आणि तिच्याशी संलग्न संघटनांच्या गुन्ह्यांची माहिती दिली आहे. पीएफआयविरोधात दोन फेऱ्यांमध्ये वेगाने छापेमारी केली. यात आतापर्यंत ३५६ जणांना अटक करण्यात आली आहे. २२ आणि २७ सप्टेंबर ला NIA, ED आणि राज्य पोलिसांनी PFI आणि त्याच्याशी संलग्न संघटनांवर छापे टाकले. छाप्यांच्या पहिल्या फेरीत पीएफआयशी संबंधित १०६ कार्यकर्ते होते. २७ सप्टेंबरला छाप्यांच्या दुसऱ्या फेरीत, PFI शी संबंधित एकूण २५० लोकांना अटक किंवा ताब्यात घेण्यात आले. तपास यंत्रणांना पीएफआयविरोधात पुरेसे पुरावे मिळाले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

2०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचे होते स्वप्न..
२२ सप्टेंबरला NIA-ED ने ऑपरेशन ऑक्टोपस अंतर्गत १५ राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या ९३ ठिकाणांवर छापे टाकले. याप्रकरणी तपास यंत्रणेने मोठा दावा केला होता. पाटणा येथे १२ जुलैला पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये एक कट रचण्यात आला होता. त्यासाठी पैसा पुरवण्यात शफीक पायथे हा सामील होता. कोझिकोडमधून त्याला अटक करण्यात आली आहे. पायथेच्या रिमांड नोटमध्ये ईडीने ही माहिती दिली.