मोताळ्यातील महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; 6 गावातील शेतकऱ्यांनी उप अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून दिले निवेदन !

81

मोताळा-(26Sep.2023)एकीकडे शासन शेतकऱ्यांना 24 तास वीज सुरळीत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन देत आहे. तर मोताळा तालुक्यातील 6 गावातील शेतकऱ्यांची लाईट गेल्या आठ दिवसापासून बंद असल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी ऑनलाईन व महावितरणकडे तक्रारी करुनसुध्दा कोणत्यात प्रकारची दखल घेतली नसल्याने आज मंगळवार 26 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी दुपारी 12 वाजता मोताळा महावितरण कार्यालयामध्ये धडक दिली. त्यावेळी कार्यालयात कोणीही अधिकारी हजर नसल्याने उप अभियंता यांच्या खुर्चीला हार घालून निवेदन देवून आपला रोष व्यक्त केला.

नळगंगा अेजी फिडर येथून डिडोळा खु, बु., चिंचपूर, भोरटेक, पिंपळपाटी, तालखेड येथील शेतकऱ्यांनी शेतात लाईट घेतली आहे. परंतु सदर फिडरमध्ये बिघाड झाल्यामुळे मागील आठ दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतात लाईट नसल्यामुळे त्यांच्या गुरे, ढोर व वासरांना पिण्यास पाणी नाही, पिकांवर फवारणी करण्यासाठी पाणी नसल्यामुळे फवारणी केल्या गेली नसल्यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत संबंधित महावितरण कर्मचारी व अधिकारी तसेच ऑनलाईन तक्रार करुन सुध्दा कोणत्याच प्रकारची दखल घेतली गेली नसल्यामुळे 6 गावातील संतप्त शेतकऱ्यांनी आज 26 सप्टेंबर रोजी मलकापूर रोडवरील महावितरण कार्यालयात धडक दिली. यावेळी निवेदन घेण्यास येथे कोणीही हजर नसल्यामुळे उप अभियंता यांच्या खुर्चीला राजेंद्र वाघ, सुमित इंगळे, शिवशंकर चोपडे, स्वप्नील श्रीनाथ, अवचितराव पाटील यांनी घार घालून निवेदन दिले.गुलाबराव वाघ, शिवाजी जुनारे, संतोष साखरकर, निळकंठ लआंजउळकर, संदिप कोल्हे, निनाजी पाचपोर, अजय गायकवाड, सुखदेव शिंबरे यांनी घालून निवेदन देत आपला रोष व्यक्त केला आहे.

लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होईल-नवलकर

मोताळा सबस्टेशनवरुन फिडर ब्रेकर नादुरुस्त होता, तो दुरुस्त होण्यासारखा नव्हता. याबाबत विभागीय मेंटनन्सकडून दुरुस्त करुन वीज पुरवठा सुरळीत करुन दुपारी 2 वाजता शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे, उप अभियंता एस.बी.नवलकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.