मोताळा: छत्रपती शिवराय,धर्मवीर संभाजीराजे अखिल विश्वातील मराठी मनाची आण-बान शानही असून मावळ्यांसाठी दोन्ही छत्रपती सदैव श्रद्धेय आणि पूजनीय आहे. परंतु देव म्हणून नव्हे तर विश्वातील अद्वितीय राम राज्याची प्रतिकृती असलेल्या स्वराज्याचे एकमेव संस्थापक कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांना साष्टांग दंडवत मानाचा मुजरा हृदयातून करू. त्यामुळे आम्ही छत्रपतींना आरतीतून नव्हे तर पोवाडे, राष्ट्रगीत राज्य गीतानेच मानवंदना देवू हा संकल्प जागृत शिवप्रेमींनी करावा, असे आवाहन जळगाव खान्देशातील शिवव्याख्याते उमेश महाराज पाटील यांनी केले आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या 369 व्या जयंतीनिमित्ताने मोताळा तालुक्यातील सारोळा मारुती येथे शिवशंभु राजे ग्रुप मंडळ, शिवप्रेमी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानातून छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास धगधगते अग्निकुंड या प्रेरणादायी विषयावरील व्याख्यानाचे आयोजन 14 में ला सायंकाळी करण्यात आले होते. त्यावेळी शिवव्याख्याते उमेश महाराज पाटील शिप्पलकर यांनी शिवशंभू सिंहगर्जनेतून शिवविचारांच्या इतिहासावर आपल्या खास शैलीतून सलग दोन तास छत्रपती संभाजींचा जीवनपट जिवंत साकारला. यावेळी शिवपिठावर शिवव्याख्याते अँड.सतीशचंद्र रोठे पाटील, सुखदेवराव शिप्पलकर, सरपंच कु.आरती शिप्पलकर, भरत ढकचवळे, रामेश्वर पाटील, पुरुषोत्तम ढकचवळे, टिकार साहेब, रामेश्वर व्यवहारे, सुशांत पाटील, भूपेश पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजीराजे यांच्या प्रतिमांना मल्यार्पण करून शिवव्याख्यानाला प्रारंभ झाला.
शिवपिठावरील उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत शंभूराजे ग्रुप मित्र मंडळ आणि शिवप्रेमी ग्रामस्थांच्या वतीने हर्षल शिप्पलकर, रोशन पाटील, गणेश झुजंरके, हर्षल नरसाळे, अभिषेक शिपलकर, चेतन नखोद, दुर्गेश वागेकर आदींनी केले. सूत्रसंचलन पुरुषोत्तम ढकचवळे सर यांनी तर आभार प्रदर्शन विठ्ठल ढकचवळे यांनी मांनले. यशस्वीतेसाठी सारोळा मारुती, फर्दापुर, वडगाव यासह पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी अथक परिश्रम घेतले. पंचक्रोशीतील शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिव व्याख्यानाची सांगता गर्जा महाराष्ट्र माझा या राज्य गीताने करण्यात आली.
























छत्रपती शिवरायांचा छावा जिजाऊंचा अष्टपैलू मावळा म्हणून स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी राजेंचा तेजोमय इतिहास मावळ्यांच्या श्वासात आहे. स्वराज्याचा नरसिंह म्हणून छत्रपती संभाजी राजेंनी 120 लढाया लढून एकही लढाई हरली नाही. अशा प्रतिभाशाली, उच्च विद्याविभूषित, गुणवत्तेचे पंडित, सोळा भाषांचे धनी, सर्वोत्कृष्ट युवराज, छत्रपती संभाजी महाराज विश्वातील मराठी मनाची अस्मिता आहे. छत्रपतींचा इतिहास शौर्य आणि पराक्रमाचे धगधगते अग्निकुंड आहे. त्यामुळेच कावळ्यांच्या शापाने गायी कधीच मरत नाहीत. शिवद्रष्टे इतिहासकार सूर्याच्या तेजाला झाकू शकत नाही. धर्मवीर छत्रपतीं शिवरायांबद्दल अपशब्द लिहिलेल्या कलुशीत इतिहासाची होळी सूर्यतेज छत्रपती संभाजी राजेंना आणखी तेजोमय करेल, असे आवाहन शिवव्याख्याते अँड.सतीशचंद्र रोठे पाटील यांनी यावेळी केले.


