अतिवृष्टीमुळे नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत पंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

434

बुलढाणा(BNUन्यूज)गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. या पंचनाम्यातून एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

जिल्ह्यात 10 ऑक्टोबर रोजी सर्वदूर पाऊस झाला. मेहकर तालुक्यातील मेहकर मंडळात 107 मिमी आणि नायगांव मंडळात 107 मिमी, तर लोणार तालुक्यातील सुलतानपूर मंडळात 105 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे दोन तालुक्यातील सुमारे 19 हजार 65 हेक्टर आर शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे. या पंचनाम्यातून नुकसानग्रस्त एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी आमदार संजय रायमुलकर उपस्थित होते. सद्यस्थितीत मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहे. येत्या दहा ते बारा दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.