Thursday, April 30, 2026
Home Buldana शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पक्षाचे झेंडे बाजुला ठेवू.. सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या एल्गार मोर्चात लाखोची...

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पक्षाचे झेंडे बाजुला ठेवू.. सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या एल्गार मोर्चात लाखोची संख्येने एकत्र येवू!!

501

आता एकच एल्गार करायचा, सरकारचा अहंकार ठार करायचा!

बुलढाणा(BNU न्यूज) जगाचा पोशिंदा बळीराजा कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाच्या अस्मानी संकटात सापडत आहे. त्यातच शेतीला लावलेला खर्च निघत नसल्याने त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच आहे. कर्जाला कंटाळून बळीराजा आपली जीवन यात्रा संपवित आहे. बळीराज्याच्या आत्महत्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आपण एक शेतकरीपूत्र, शेतकरी हितचिंतक म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पक्षाचे झेंडे बाजुला ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली 6 नोव्हेंबर रोजी सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या ‘एल्गार मोर्चाला’ लाखोच्या संख्येने बुलढाणा येथे एकत्र येवून एल्गार पुकारुया, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन-कापूस उधवस्त झाला आहे. जे काही पिके वाचले आहेत त्याला केंद्राच्या आडमुठ्या धोरणामुळे रास्त भाव नाही. त्यातच राज्य सरकारची भरपाई अत्यंत तोकडी आहे. पश्चीत महाराष्ट्रातील ऊस व दूध उत्पादक शेतकरी संघटीत आहेत. व ते आंदोलनाच्या जोरावर पाहिजे तो भाव मिळवून घेतात. मागीलवर्षी स्वाभिमानीच्या अन्नत्याग आंदोलन व एकजुटीमुळे सोयाबीनला 8 हजार पर्यंत व कापसाला 12 हजार पर्यंत भाव मिळाला होता. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी पेटून उठला की काय होते, याची प्रचिती स्वाभिमानीने करुन दिली होती. यावर्षी सोयाबीन कापूस उत्पादकांच्या न्याय्य हक्कांसाठी पुन्हा नवा एल्गार पुकारुया.. !! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शे्ट्टी यांच्या प्रेरणेखाली रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात रविवार 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता जगदंबा माता मंदीर (मोठी देवी) चिखली रोड, बुलढाणा जगदंबा मातेला साकडे घालून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यल्गार मोर्चात शेतकरी बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
अशा आहेत शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या..
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करुन विनाअट तात्काळ 50 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, सोयाबीनला प्रति क्वींटल 8700 तर कापसाला 12300 रुपये भाव देण्यात यावा,
सोयापॅड डीओसी व कापूस तसेच सूत निर्यातीला प्रोत्साहन देण्यात यावे, मागील वर्षी आयात केलेल्या 5 लाख मेट्रीक टन सोयापेंडीला डिसेंबरपर्यंत दिलेली मुदत वाढ रद्द करण्यात यावी, सोयापॅड डीओसी आयात करणार नाही, हे केंद्राने जाहीर करावे, कापसाचे आयात शुल्क पुर्वीप्रमाणे 11टक्के करावे,शेतमजुरांना सुरक्षा कवच देण्यात यावे, कृषी कर्जासाठी सिबीलची अट करण्यात यावी, मेंढपाळांना चराईक्षेत्र उपलब्ध करुन देण्यात यावे, लम्पी आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांना शासनाने 100टक्के मोबदला द्यावा,महिला बचत गटाचे कर्ज माफ करुन सरकारने त्यांना भरीव प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, यासह आदी न्याय्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शे्ट्टी यांच्या प्रेरणेखाली रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात रविवार 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता जगदंबा माता मंदीर (मोठी देवी) चिखली रोड, बुलढाणा जगदंबा मातेला साकडे घालून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यल्गार मोर्चा शेतकरी बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Don`t copy text!