बुलढाणा : (LOKSABHA NIVADNUK) सर्व बहुजनांना एकत्रीत करून प्रस्थापितांविरोधात आवाज उठविण्याचे काम बहुजनमुक्ती पार्टी गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. जे समाज बहुसंख्येने असतानाही त्यांना विकासापासून दूर ठेवले जाते. बहुजन, उपेक्षित, शोषित घटकांना सत्तेच्या प्रवाहात येऊ दिले जात नाही. मात्र आता इथला बहुजन जागा झाला आहे. बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात बहुजनमुक्ती पार्टीने प्रवेश केल्याने प्रस्थापित महाविकास आधाडी व महायुती उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा दावा बहुजन मुक्ती पार्टीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील यांनी केले.
स्थानिक कृष्णा हॉटेलच्या सभागृहात मंगळवारी बहुजनमुक्ती पार्टीच्यावतीने नामांकन दाखल करण्यापूर्वी आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, बहुजनमुक्ती पार्टीने अनेकदा रस्त्यावरच्या लढाया लढल्या आहेत. वाढती बेरोजगारी, सीएएच्या विरोधात जिल्हाभरात अनेक आंदोलने केली आहेत. मराठा व धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी संघर्ष केला आणि भविष्यातही संघर्ष सुरूच असेल. बुलढाणा जिल्ह्याचा विकासात्मक कायापालट घडवून आणण्यासाठी बहुजनांची मोठी फळी आजघडीला बहुजनमुक्ती पार्टी सोबत उभी आहे. ग्रामीण भागातील विखुरलेला बहुजन समाज एकजुटीने बहुजनमुक्ती मोर्चासोबत उभा असून कार्यकर्त्यांनी आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी सर्वशक्तीनिशी काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी धनंजय रैदळे, शेख नाजिम कुरैशी, सागर मोरे, सुशीला जवंजाळ, समाधान ताजणे, सुधिर सोनटक्के, विजय इंगळे, गजानन पवार यांसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.